CM Fadnavis : मुख्यमंत्री साहेब, शिक्षणाचा खेळखंडोबा थांबवा ! फडणवीसांचाच फडणवीसांना सल्ला

Top Trending News    11-May-2025
Total Views |

cm 
नागपूर : ( CM Fadnavis ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका पत्राद्वारे शालेय शिक्षणाचा खेळ-खंडोबा थांबवा, असे शिक्षण संस्था महामंडळाचे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. पत्रातून मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधत रवींद्र फडणवीस म्हणाले, विधानसभा निवडणुकांनंतर नवे सरकार आल्यानंतर शासनाने दिलेला 100 दिवसांचा कृती आराखडा तयार करण्याचे उद्दिष्ट शिक्षण विभागाला दिले होते. पण शिक्षण विभाग केवळ 35 टक्के उद्दिष्टपूर्ती करु शकला. शिक्षण समितीच्या शिफारशी वगळून नवे शैक्षणिक धोरण लादले जात आहे. शिक्षण क्षेत्रात कार्यरत संस्था, संघटनांना विश्वासात न घेता हा निर्णय घेतला गेला आहे. शालेय वार्षिक नियोजनाचे अधिकार नसताना देखील अधिकारी शासन आदेश काढून हस्तक्षेप करीत आहेत.
 
नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणीसाठी नेमलेल्या समितीच्या शिफारशी डावलून शिक्षण विभागाने शालेय शिक्षणाचा खेळखंडोबा करण्याचा घाट घातला आहे, असे निदर्शनात येते. शिक्षकांनी याला प्रखर विरोध झाल्यानंतरही सरकार हा निर्णय मागे घ्यायला तयार नाही. यातून शासनाची प्रतीमा मलिन होत आहे. त्यामुळे जातीने लक्ष घालून बेकायदेशीर शासन निर्णय मागे घ्यावा, शिक्षणाचा खेळखंडोबा थांबवावा, असे साकडे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे सरकार्यवाह रवींद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( CM Fadnavis ) यांना घातले आहे.
 
कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद होणार नाही, असे शासनाचे धोरण असतानाही शासन निर्णयाचा बेकायदेशीर वापर करुन शाळा बंद करण्याचा उपद्व्याप अधिकारी करीत आहेत. या बाबींची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस ( CM Fadnavis ) यांनी संयुक्त बैठक घेऊन हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणीही यातून करण्यात आली आहे. राज्यातील शाळांच्या स्थितीची पाहणी करुन शाळा सुस्थितीत आणाव्या, शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करावे त्यानंतर नवे शैक्षणिक धोरण लागू करावे, अशा शिफारसी समितीने केल्या होत्या. त्या डावलून शिक्षणाचा खेळखंडोबा होण्याची जोखीम आहे. यामुळे राज्य सरकारची प्रतिमा मलीन होण्याचा धोका आहे.