नागपूर : ( Marks Manipulation Scam ) महापालिकेत पदभरती करण्यासाठी परीक्षा घेण्याची जबाबदारी टीसीएस कंपनीकडे दिली होती. टीसीएस कंपनीने महापालिकेसाठी मार्चमध्ये परीक्षा घेतली. या कंपनीने आता घेतलेल्या परीक्षेचे गुण जाहीर केले आहे. यावरून विद्यार्थ्यांमध्ये संताप दिसून येत आहे. टीसीएस कंपनीने काही विद्यार्थ्यांचे गुण वाढविल्याचा आरोप परीक्षार्थींनी केला आहे. नव्याने गुणांबाबत प्रक्रिया करण्याची मागणी करण्यात येत असल्याने ही भरती परीक्षा आता संकटात सापडली आहे.
महापालिकेत सिव्हिल सहायक अभियंता व कनिष्ठ अभियंता पदाच्या भरतीसाठी मार्चमध्ये टीसीएसने परीक्षा घेतली. यात कनिष्ठ अभियंता पदासाठी 9 हजारांवर तर सहायक अभियंता पदासाठी 19 हजारांवर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. गुरुवारी या परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला असून महापालिकेने त्यांच्या संकेतस्थळावर गुणांसह यादी प्रकाशित केली. गुणांसह यादी प्रकाशित होताच परीक्षार्थींमध्ये नॉर्मलायझेशन गुणावरून ( Marks Manipulation Scam ) संताप व्यक्त केला जात आहे.
नॉर्मलायझेशन पद्धती
परीक्षेच्या सर्व सत्रांमध्ये प्रश्नपत्रिकेचे स्वरुप व अवघडपणा सारखाच होता, असे या विद्यार्थ्यांचे निरीक्षण आहे. त्यामुळे वेगवेगळ्या सत्रातील गुणांमध्ये फरक करणे योग्य नसल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. नॉर्मलायझेशन पद्धतीने गुणांत जास्त तफावत यायला नाही पाहिजे. परंतु, प्लस 20, प्लस 25, प्लस 30 असे गुण वाढविण्यात आले. त्याचवेळी काही विद्यार्थ्यांचे गुण कमी करण्यात आले आहे. त्यामुळे 85-90 टक्के योग्य पेपर सोडविल्यानंतर 170, 175, 180 गुण घेऊनही निवड होणार नसल्याचे नमूद करीत विद्यार्थ्यांनी ही नॉर्मलायझेशन गुणांची प्रक्रिया ( Marks Manipulation Scam ) पुन्हा एकदा योग्य व पारदर्शक पद्धतीने करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
जनता दरबारात मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार
विद्यार्थ्यांनी याबाबत 17 मे रोजी झालेल्या जनता दरबारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. मागील जलसंपदा विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाने मागील काळात रिक्त पदांसाठी परीक्षा घेतली होती. परंतु, महापालिकेने टीसीएस मार्फत घेतलेल्या नॉर्मलायझेशन गुणांची प्रक्रिया त्या परीक्षेप्रमाणे नसल्याचे विद्यार्थ्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. विविध सत्रातील उमेदवारांच्या गुणांचे एकसंध व न्याय मूल्यमापन व्हावे, या दृष्टीने नॉर्मलायझेशन अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र टीसीएसने यावेळी घेतलेल्या परीक्षेत ते न झाल्याने संताप व्यक्त होत असल्याचेही म्हटले आहे.
परीक्षार्थींची संख्या
कनिष्ठ अभियंता (सिव्हिल) पदासाठी : 9,251
सहायक अभियंता (सिव्हिल) : 19,482