मुंबई : ( Ravindra Chavan ) महाराष्ट्रातील भाजपाला नवा प्रदेशाध्यक्ष मिळाला आहे. माजी मंत्री आणि डोंबिवलीचे चार वेळा आमदार रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी प्रदेशाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्यातील अन्य प्रमुख नेते उपस्थित होते. मंगळवारी संध्याकाळी चव्हाण यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार असल्याचे भाजपाने जाहीर केले आहे. ही निवड आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चव्हाण यांच्या निवडीचे समर्थन करताना त्यांच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख केला. रवींद्र चव्हाण यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला युवा मोर्चाचा कार्यकर्ता म्हणून सुरुवात केली. त्यानंतर ते नगरसेवक, आमदार आणि मंत्री झाले. त्यांनी नेहमीच पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. चव्हाण यांनी 2009 पासून डोंबिवली मतदारसंघातून सलग चार वेळा विधानसभा निवडणूक जिंकली आहे. याशिवाय, त्यांनी महायुती सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाची जबाबदारी ( Ravindra Chavan ) सांभाळली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना, भाजपने रवींद्र चव्हाण यांच्यासारख्या मराठा समाजातील प्रभावी नेत्याला पुढे आणून पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलण्याचा प्रयत्न केला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर चव्हाण यांच्या नियुक्तीमुळे मराठा समाजाला एक सकारात्मक संदेश जाईल, अशी अपेक्षा पक्षाला आहे.