नागपूर : ( Tribal Land Rights ) भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील सीतासावंगी येथील आदिवासी भूखंडावर विवेकानंद शिक्षण संस्थेच्या तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे अतिक्रमण आहे. विशेष महत्वाची बाबा म्हणजे हे अतिक्रमण चाळीस वर्षांपासून असल्याची माहिती प्रा. अखिलेश तिवारी यांनी उच्च न्यायालयात दिली. प्रा. तिवारी हे विवेकानंद कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिक विभाग प्रमुख पदावर कार्यरत होते. 2017 मध्ये काही कारणांमुळे त्यांना नोकरीतून बडतर्फ करण्यात आले. प्रा. तिवारी यांनी महाविद्यालयाच्या अतिक्रमणाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. जमिनीचा ताबा घेण्याबाबत शिक्षण संस्थेला मंजुरी नव्हती.
विवेकानंद तंत्रनिकेतन महाविद्यालयाने बळकावलेल्या आदिवासी भूखंडाचा प्रस्ताव महसूल विभागाने रद्द केला. त्यानंतर, उच्च न्यायालयाने भंडारा जिल्हाधिका-यांना भूखंडाचा ताबा कधी घेता अशी विचारणा केली होती. त्यानुसार जिल्हाधि-यांनी महाविद्यालयाला भूखंड रिकामा करण्यासाठी नोटीस बजावली. या नोटीस ला शिक्षण संस्थेने उच्च न्यायालयातच रिट याचिकेद्वारे आव्हान दिले. गुरुवारी या रिट याचिकेत प्रतिवादी करवून घेण्याची विनंती जनहिय याचिकेचे मूळ याचिकाकर्ते अखिलेश तिवारी ( Tribal Land Rights ) यांनी केली आहे.
उच्च न्यायालयाने विनंती अर्ज स्वीकारून शिक्षण संस्थाचालकांना दोन आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती मनोहर नेरलीकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. 1978 मध्ये शिक्षण संस्थेने ही जमीन आदिवासी व्यक्तीकडून केवळ हजार रुपयाच्या बक्षीस पत्रावर मिळवली होती. यानंतर संस्थेने मंत्रालयात पाठपुरावा करून जमिनीचा भाडेपट्टा वाढविण्यासाठी प्रस्ताव दिला होता. हाच प्रस्ताव महसूल विभागाकडून रद्द करण्यात आला. त्यानंतर उच्च न्यायालयाने जिल्हाधिका-यांना पुढील पावले उचलण्याचे आदेश ( Tribal Land Rights ) दिले होते. प्रा. तिवारी यांच्यातर्फे अॅड. संदीप बदाना यांनी बाजू मांडली.