दिल्ली : ( Rahul Vs Modi ) अमेरिकेने भारतावर 25 टक्के टॅरिफ लावले यावर टीका करताना राहुल म्हणाले की, “ट्रम्प ठरवतील व्यापार करार कसा असावा आणि मोदी त्यानुसारच वागतील. याआधी नोटबंदी, चुकीचा जीएसटी, असेंबल इन इंडिया यामुळे आर्थिक नुकसान झाले आहे.” राहुल गांधी म्हणाले की, “पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना सोडता देशातील सर्वांना माहिती आहे की भारताची अर्थव्यवस्था संपलेली आहे. मोदींनी देशाची अर्थव्यवस्था नष्ट केली आहे. त्यांनी केवळ अदाणींसाठी काम केले, छोटे उद्योग मोडून टाकले, एमएसएमई संपवले, शेतकऱ्यांना पिचवले आणि तरुणांचे भवितव्य अंधारात टाकले.”
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला 'डेड इकॉनॉमी' म्हटले यावरून वादांग उठले आहे. यावरून संसदेत जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. यावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी यांनी परराष्ट्र धोरणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते पुढे म्हणाले की, “अमेरिका अपमान करत आहे, चीन दबाव टाकतोय, पाकिस्तानवर कोणताही देश टीका करत नाही. हे यश आहे का ? पंतप्रधानांच्या भाषणात ट्रम्प, चीन, पाकिस्तान या विषयांचा उल्लेखही नाही.” सरकारकडे कोणतीही दिशा नाही, दिशाहीन सरकार अशी घणाघाती टीका करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना ( Rahul Vs Modi ) थेट जबाबदार धरले आहे.